जळोची -रविवारी (दि. 20) सकाळी 8 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात जमीन फसवणुकीची तक्रार घेऊन फलटण तालुक्यातील 11 शिक्षक आले होते.
त्यानंतर पवारांच्या सूचनेनुसार तपास करून बारामती शहर पोलिसांनी रविवारीच रात्री या शिक्षकांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळवून दिल्या.
दरबारात रविवारी सकाळी तक्रार व पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री न्याय मिळाल्याने त्या फलटण शिक्षक ग्रुपने समाधान व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील 11 शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर सर्व मिळालेली आयुष्यभराची रक्कम खर्च करून बारामती शहरातील खंडोबानगर येथे ग्रुपमध्ये 60 गुंठे जागा विकत घेतली होती.
त्यातील 40 गुंठे जागा शहरातील नामांकित “तीन एजंट’च्या माध्यमातून विकली त्या तिघांनी कमिशन तर कमावले व त्याचबरोबर फलटण ग्रुपचा विश्वास संपादित केला. त्यामुळे फलटण शिक्षक ग्रुप त्या तिघांवर खूश होता.
आता राहिलेले 20 गुंठे विकण्याची जबाबदारीसुद्धा त्या तिघांवर टाकली. तिघांनी 20 गुंठे विकली आणि त्यातील फक्त 14 लाख रुपये दिले व राहिलेले 1 कोटी 28 लाख 50 हजार आज-उद्या देऊ, खरेदी (दस्त नोंदणी) करून द्या, असे सांगितले;
परंतु काही तासांतच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. दरम्यान, सोमवारी दस्त नोंदणी रीतसर होणार होती,
त्यामुळे रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात यातील काही जणांनी व्यथा मांडून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
अजित पवार यांनी त्वरित दरबारात उपस्थितीत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू आणि सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना रक्कम देऊन टाकण्यास सांगा अशी सूचना केली.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार निरीक्षक नामदेव शिंदे, फौजदार बाळासाहेब जाधव,
हवालदार गोपाळ ओमासे, पोलीस शिपाई अंकुश दळवी, आबासो चौधर यांनी त्वरित तिघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली; परंतु प्रतिसाद देत नसल्याने पोलीस खाक्या दाखवताच फसवणूक केल्याची कबुली दिली.
या तिघांना वाचवण्यासाठी अनेकांनी राजकीय प्रतिष्ठापणाला लावली; परंतु खाकी वर्दीने चोख काम केले अखेर दस्त पलटून देण्याचे लिखित स्वरूपात मान्य केले.