माधव विद्वांस
“सांजवात’ हे आत्मचरित्र लिहिणाऱ्या आनंदीबाई शिर्के यांचे आज पुण्यस्मरण. (निधन 31 ऑक्टोबर 1986) त्यांचा जन्म 3 जून 1892 रोजी बडोदा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तुकाराम शिंदे. पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील रांजणी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील श्रीमंत सयाजीमहाराजांच्या सेवेत होते त्यामुळे राजघराण्याशी त्यांची जवळून ओळख होती. राजशिष्टाचारही त्यांना अंगवळणी पडले होते. त्या कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून त्या काळात प्रसिद्ध होत्या. त्यांचे शिक्षण गुजरात येथे झाले. श्रीमंत सयाजीरावांनी आपल्या राज्यात मुला-मुलींचे प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. त्यासाठी प्रौढ स्त्रियांसाठी जनाना वर्गाची सोय करण्यात आली होती. त्यांच्या वडिलांनाही आपल्या लहान मुलींना या प्रौढ स्त्रियांबरोबर जनाना वर्गात घातले होते. त्याकाळी पुरुष शिक्षक, पुरुष परीक्षक यांच्यापासून मुली दूर राहाव्यात असा उद्देश असे. त्यांना मिस मेरी भोर या शिकवत असत.
आनंदीबाई यांचं “सांजवात’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांनी वर्ष 1910 मध्ये मासिक मनोरंजनमध्ये “शारदाबाईंचे संसारचित्र’ ही कथा कु. आनंदी या नावानं प्रसिद्ध झाली. नवीन लेखिका आणि आकर्षक शीर्षक यामुळे वाचकांना ती भावली व त्यांच्यातील लेखिका वाचकांचे पुढे आली. त्यांच्या आत्मकथनांमध्ये त्यावेळचे रितीरिवाज, व्रतवैकल्ये, सण, चालीरिती, लग्नविधी, खाद्यपदार्थ, दागिने, दैनंदिन जीवनव्यवहार इत्यादींचे सुंदर वर्णन केले आहे. सुरुवातीला एखादी स्त्री लिहीत आहे याचे कुतुहल असायचे. त्यानंतर ती काय लिहिते म्हणून लोक वाचायचे.
सन 1912 मध्ये “मराठा मित्र’ या मासिकात त्यांची “बेगम दिलआरा’ ही एक मोगल काळातील प्रेमकथा प्रसिद्ध झाली. ही कथाही वाचकांना आवडली व त्यांचे लेखिका म्हणून नाव अधोरेखित झाले. यावेळी प्रसिद्ध लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी संपादकांकडे त्यांच्याबद्दल विचारणा केली.त्यानंतर त्यांचा परिचय वाढला. आनंदीबाई त्यांच्याशी सल्लामसलत व मार्गदर्शनही घेत असत. इतकेच नव्हेतर कोल्हटकर त्यांचे लेखनही आनंदीबाईंना व त्यांच्या पतीला दाखवून विचारविनिमय करीत असत. यामुळे आनंदीबाईंच्या साहित्याची उंची लक्षात येते. आनंदीबाई आणि कोल्हटकर यांच्यातील पत्रव्यवहाराचं संपादन डॉ. अंजली सोमण यांनी केले आहे. वर्ष 1938 मध्ये अखिल भारतीय मराठी महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 1984 मध्ये जळगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
मराठा मित्रचे कार्यकारी संपादक शिवराम शिर्के यांचेशी लेखिका म्हणून त्यांचा परिचय झाला होता. त्याचे प्रेमात रूपांतर होऊन त्यांनी प्रेमविवाह केला. कथाकुंज, कुंजविकास, जुईच्या कळ्या, भावनांचे खेळ व इतर गोष्टी, तृणपुष्पे, गुलाब जांब, माझ्या आवडत्या गोष्टी, वाघाची मावशी व इतर गोष्टी, कुरूप राजकन्या व तेरावी कळ आणि इतर गोष्टी, आपली थोर माणसे अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.