बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत दाखल होत असताना बहुतेक कलाकार मुख्य नायक-नायिकेच्या भूमिकेत आपल्याला झळकायचंच हे उद्दिष्ट किंवा ध्येय घेऊन येत असतात. यासाठी सुरुवातीला ते छोट्या-मोठ्या भूमिका करत राहतात. आगामी काळात एक ना एक दिवस आपल्याला मुख्य भूमिका मिळेल या आशेवर ही मंडळी हा संघर्षकाळ ते सुसह्य करत जगत असतात.
पण प्रत्येकालाच ही संधी मिळते असं नाही. अनेकांचं हे स्वप्न साकार होत नाही. पण एखादा कलाकार जेव्हा मला कधी नायक बनायचंच नव्हतं असं म्हणतो तेव्हा त्याचं विशेष वाटल्या वाचून राहात नाही.
आता हेच पहा ना, सतीश शहा या बॉलीवूड चित्रपटांमधील आणि टीव्ही मालिकांमधील बहुचर्चित कलाकाराला कोमल नहाताच्या “और एक कहानी’ या कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान हा प्रश्न विचारण्यात आला होता. बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील आपल्या प्रवासाविषयी बोलताना सतीश शहांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
पण या आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार होत असतानाच ते किती वास्तववादी आहेत याचीही झलक मिळाली. सतीश शहा सांगतात की, मी माझा आजवरचा प्रवास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो; पण तरीही मला कधीही नायक बनायचं नव्हतं. याचं कारण मला आधीपासूनच माहीत होतं की मी नायकासारखा दिसत नाही.
हे उत्तर अनेकांना आश्चर्यचकित करणारं असलं तरी एक गोष्ट खरी आहे की, कोणताही कलाकार त्याला मिळालेल्या भूमिकेपक्षाही मिळालेली भूमिका किती ताकदीने साकारतो आणि आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांचे किती आणि कसे मनोरंजन करतो यावरच त्याची लोकप्रियता ठरत असते. सतीश शहांना भलेही नायकाचा रोल मिळाला नसेल तर पण त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला हे मात्र निश्चित!