मुंबई : दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. मात्र, दिवाळी सुरु झाली तरी लोकांपर्यंत हा आनंदाचा शिधा पोहचली नसल्याने विरोधकांकडून यावरून सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, आता या सर्वात सरकारकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी, ‘तुळशी विवाहपर्यंत आपली दिवाळी असते. त्यामुळे उशिरा का होईना पण ‘आनंदाचा शिधा’ घरोघरी पोहचणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.
कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. याविषयी बोलताना त्यांनी”आम्ही लोकांची दिवाळी गोड केली असल्याचा दावाही त्यांनी केला. दीपक केसरकर यांनी आनंदाचा शिधा विषयी विचारले असता त्यांनी, “तुळशी विवाहपर्यंत आपली दिवाळी असते. उशिरा का होईना पण आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार” असल्याचे त्यांनी सांगितले. आनंदाचा शिधातील साहित्याची पॅकेजिंग करणे व इतर कामांमध्ये वेळ लागत असल्याने उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार आनंदाचा शिधा वितरीत होत असून लोकांची दिवाळी गोड झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच त्यांनी, नागरिकांना हे आपलं सरकार वाटतं. नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारविरोधात लिहून रोष ओढवून घेतला होता. खऱ्या अर्थाने आता जनतेच्या मनातील सरकार आले असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महागाईच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी ‘आनंदाची शिधा’ जाहीर केली होती. राज्यातील अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा पोहचला आहे. तर अद्याप बऱ्याच ठिकाणी नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळालेला नाही. दिवाळी सुरु झाली असतानाही अद्याप अजून बऱ्याच लोकांना हा आनंदाचा शिधा मिळाला नाही. अजूनही बरेच लोक या आनंदाच्या शिधाच्या प्रतीक्षेत आहेत. यातच राज्यात काही ठिकाणी याचा काळाबाजार ही सुरु झाल्याचे वृत्त आहे. दिवाळीनंतर हा शिधा मिळून काय उपयोग असा संतप्त प्रश्न जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच मंत्री केसरकर यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.