“महाशिवसेनाआघाडी …. सत्ते साठी काय पण…’
मुंबई- रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर समाजमाध्यमांतून शिवसेनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहेत. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचा धोरणात्मक कॉंग्रेस-विरोध आणि हिंदुत्त्वाच्या मुद्यावर झालेली भारतीय जनता पक्षाशी असलेली सोयरीक या वर्षीच्या निवडणुकीत तुटण्याच्या जवळपास येवूनही हे दोन्ही पक्ष
“युती तुटली’ असे का जाहीर करत नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे. विधानसभेतील दुसरा मोठा ठरलेली शिवसेना आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन करणार का, आणि “शिवसेनेचाच मुख्यमंत्री’ ही उक्ती सार्थ करणार का, हाही प्रश्न विचारला जात आहे.
“तुम्ही अडीच वर्षे मागितली… आम्ही आता तुम्हाला पाच वर्षे दिलीत…’ अशा आशयाच्या पोस्ट्स फेसबुक आणि व्हॉट्सऍपमध्ये व्हायरल होत आहेत. एका मुंबईतील मतदाराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेले अनावृत्त पत्रही समाज माध्यमांतून फिरत असून, या पत्रात शिवसेनेच्या साओयीस्कर राजकारणाचा पर्दाफाश केला आहे. “तुमच्या ह्या विश्वासघाताचा हिशोब जनता वेळ आल्यावर चुकता करेलच हें मात्र नक्की लक्षात घ्यावे हीच विनंती…’ असे या पत्रात शेवटी म्हटले आहे.
“आता शिवसेनेला सेक्युलर करुन घेण्यासाठी कॉंग्रेसजन कुठून गोमूत्र आणणार’ असा प्रश्न काही जणांनी विचारला असून एकाने तर “तुम्हा दोघांना “हिंदुत्वाची” कण भर चाड असेल तर गपगुमान सत्ता स्थापन करा, जनादेश पाळा…’ असा युतीच्या प्रमुख घटक पक्षांना सज्जड दमही भरला आहे. भाजपा सरकार स्थापन करण्यास तयार नसल्याने आता पुढील वाटाघाटी करण्यासाठी कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्ष “सोनिया गांधी “मातोश्री’वर जाणार का?’ असा खोचक प्रश्नही एकाने उपस्थित केला आहे.
“उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलेले वचन कॉंग्रेस पूर्ण करणार का?’ अशा शब्दांत एकाने शिवसेनेच्या सैद्धांतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून, “बाबरीच्या जागी पुन्हा मशीद बांधण्याचं आश्वासन देणारी कॉंग्रेस, मशीद पाडल्याची जबाबदारी ‘स्वतः’हून स्वीकारलेल्या शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणार का’? असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. एकाने युतीतील दोन्ही प्रमुख पक्षांना कानपिचक्या देताना म्हटलं आहे की, “दोस्ती आहे तर मस्ती सोडा; मित्राला शत्रूप्रमाणे नाही तर मित्राप्रमाणे वागणूक द्या.’ तर काही जणांनी आता “वाघाच्या पंजावर घड्याळ कोण बांधेल?’ असाही खोचक प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपाचा पाठिंबा आहे. एकाने याची आठवण करुन देत,”बीएमसीमध्येही पाठिंबा काढा म्हणावं; म्हणजे तिथेही शिव-महा-आघाडी येईल.’ राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिले हे समजल्यानंतर माध्यमांत उमटलेली महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणजे, “सेनेला संधी… काय करणार पवार-गांधी?’ तर काही जणांनी कॉंग्रेसहसह राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर केलेल्या अश्लाघ्य टिकेपासून अनेक ऐतिहासिक संदर्भांना उजाळा दिला आहे.