औरंगाबाद : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र असे असले तरी राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच ब्लॅक फंगसचे संकट गडद होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील औरंगाबाद शहरात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण म्यूकरमायकोसिसमुळे औरंगाबादमध्ये आतापर्यंत तब्बल 100 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आतापर्यंत 910 म्यूकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, औरंगाबादमध्ये म्यूकरमायकोसिसचा स्फोटच झाल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात म्यूकरमायकोसिसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 15 नव्या म्यूकरमायकोसिस बाधितांची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्याही चिंतेत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये म्यूकरमायकोसिसचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच कोरोनानंतर आता या नव्या रोगाने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
म्यूकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन काही जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये अँफोटेरीसिन-बी या इंजेक्शनचा पुरवठा न झाल्याने दिवसभरात नागरिकांना एकही इंजेक्शन मिळाले नव्हते. परिणामी रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ होत असल्याचेही दिसून आले.