पिरंगुट -उरवडे (ता. मुळशी) येथे सोमवारी कारखान्यात लागलेली आग ज्वलनशील पदार्थांमुळेच भडकली. यामध्ये 17 कामगारांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह जळून खाक झाले. मृतदेहाची ओळख पटवण्यास आणखी तीन दिवस लागतील. “डीएनए’ चाचणी करून मृतदेहाची ओळख पटवावी लागणार आहे.
त्यानंतरच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले जातील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली. त्याचवेळी चौकशी अहवालानंतर दोषींवर कारावाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उरवडे येथील एसव्हीएस ऍक्वा टेक्नॉलॉजीस या कंपनीला सोमवारी (दि. 7) भीषण आग लागली होती.घटनास्थळाला मंगळवारी (दि. 8) सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. कंपनीला आग लागलेल्या जागेची आणि मृतदेह सापडलेल्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली.
तसेच मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, बाबा कंधारे आदी उपस्थित होते.