यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील राळेगाव येथील गुजरी शिवारात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. अरुण गोंडे यांच्याशिवाय पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
गुजरी शिवारातील अरुण गोंडे हे काही दिवसांपासून गायी चरण्यासाठी शेतातील शेडमध्ये मुक्कामास होते. काल (29 मार्च) संध्याकाळी राळेगाव येथे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रात्री वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका गायीचाही मृत्यू झाला आहे.
या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या कुटुंबाच्या एकूण 50 गायी असून एका गायचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मृतांची नावे अद्याप समोर आली नसून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र शोक पसरला आहे.