एकदा एक वाटसरू रस्त्यातच उभा होता. त्याला ज्या वाटेने जायचे होते ती वाट त्याला नीट दिसत नव्हती. रात्रीची वेळ आणि आकाशातल्या चंद्राचा प्रकाशही पायाखालचं नीट न दिसणारा. तो एक पाऊल पुढे जायचा आणि चार पावलं मागं यायचा.
थोडा वेळ असाच गेला. त्या वाटसरूला दुरून एक साधू त्याच वाटेने येताना दिसला. जसा का तो साधू पुढे आला तसा त्या वाटसरूने त्याला वाकून नमस्कार केला. “कल्याण भव!’ साधूने त्याला आशीर्वाद दिला. वाटसरू चार पावलं पुढे चालत गेला आणि पुन्हा परत आला.
साधूने एकवार त्या वाटसरूच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याला कधी चार पावलं पुढे जाताना, तर कधी चार पावलं मागे येताना पाहिले. साधूला काही राहावले नाही. त्यांनी विचारले, “”काय रे बाबा! काय झालं, तू असा गोंधळलेला का दिसतो आहेस? तुझी अडचण तरी काय आहे?”
वाटसरू म्हणाला, “”त्याचं काय आहे, खरं तर मला त्या पलीकडच्या गावाला जायचं आहे. पण आज अंधार आहे. पायाखालची वाटही नीट दिसत नाही. मी विचार करतोय की आता न जाता सकाळी चांगलं उजाडलं, दिसायला लागलं की मी माझ्या गावाला जाईन.”
साधू म्हणाला, “”हे बघ तुला त्या गावाला जायचंच आहे ना. मग उद्याची वाट कशाला पाहतोस. आजच चल ना, हे बघ माझ्याकडे हा छोटासा कंदील आहे. मला पण तिकडेच जायचे आहे. चल माझ्या बरोबर.” त्यावर तो वाटसरू म्हणाला, “”महाराज! अहो तो कंदील केवढासा, आपल्याला जायचं तर दूर आहे. त्याचा थोडासा प्रकाश आपल्याला पुरणार तरी कसा? त्यापेक्षा मी आपला सकाळीच दिसायला लागल्यावरच जातो.” त्याचे ते बोलणे ऐकले आणि साधू महाराज म्हणाले, “”अरे बाबा, सावधानतेने चालायला असा कितीसा प्रकाश लागतो. पायाखालचं दिसलं म्हणजे झालं.
तेवढा तर प्रकाश हा छोटा कंदील आपल्याला नक्कीच देईल. चल माझ्या बरोबर. तू जर नुसती वाटच बघत बसलास तर तोवर कदाचित फार उशीर झालेला असेल” अखेर त्या वाटसरूला ते साधूचे बोलणे पटले. तो त्यांच्या सोबत त्या पायाखालच्या कंदिलाच्या प्रकाशात गावाकडे वाटचाल करू लागला.
आयुष्याचेही तसेच आहे. अंधारलेल्या भविष्यात कुणीतरी आपल्याला थोडासा प्रकाशाचा मार्ग दाखवतो. त्या मार्गाने आपण पुढे जात राहायचे भलेही तो प्रकाश पायाखालचाच का असेना.
अरुण गोखले