पू. स्वामी माधवनाथ हे आपल्याकडे येणाऱ्या भक्त, भाविक, साधक आणि उपासकांना हेच वारंवार सांगत की, “”बाबांनो! तुम्ही सर्व जण ज्ञानी आहात. पण माझं तुम्हाला हेच सांगण आहे की त्या ज्ञानीपणा बरोबरच तुम्ही आत्मज्ञानीसुद्धा बना.”
स्वामीच्या हा सांगाव्याचा नीट बारकाईने विचार केला, तर आपल्याला हे नक्कीच लक्षात येईल की, त्यांचा हा बोध आध्यात्मिकदृष्ट्या फारच महत्त्वाचा आहे. कारण आपण सर्वजण बहुभाग्याने या मानवी जन्मास आलो आहोत. जर जीवाला ही जन्ममरणाची बेडी, हे फेरे चुकविण्याची प्रबळ इच्छा असेल तर त्याने आपल्याच मनाला हा प्रश्न विचारायला हवा की, मी कोण आहे? मी कुठून जन्माला आलो आहे? मला कुठे जायचे आहे? माझ्या या बहुभाग्याने प्राप्त झालेल्या मानवी जन्माची खरी सार्थकता ही कशात आहे?
स्वामी म्हणतात की, मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेकांच्या मनात असा विचारही येत असेल की, आम्हाला कुठे संत, महंत व्हायचे आहे? मग आम्ही उगाच का या गोष्टीचा विचार करावा? पण बाबाहो! तसा विचार करणे हीच सर्वात मोठी चूक आहे. त्या चुकीमुळेच आपली आपल्याला खऱ्या स्वरुपापासून फारकत होते आहे. आपण जीवनात सुख लाभावे म्हणून त्याच्या साधनांची आठवण करतो. पण आपल्याला जो खरे अंतरिक सुख देणारा दाता आहे, त्याची मात्र आपल्याला आठवणच नसते. त्याची आठवण करणे हेच आत्मज्ञान आहे. ते ज्ञान जो प्रयत्नपूर्वक मिळवितो तोच आत्मज्ञानी. कारण या जगात ज्ञानवंतांची, पढत विद्वानांची कमतरता नाही. सुशिक्षित सगळेच आहेत, पण सुसंस्कारीत मात्र फारच थोडे. कारण ज्ञानवंतांना त्याचा अभिमान ग्रासतो. ते आपला अहंकाराचा फणा वारंवार वर काढतात.
जर ज्ञानी हे खरंच आत्मज्ञानी असते तर त्यांनी विठ्ठलपंतांच्या मुलांना दूर लोटलं नसतं. त्यांनी चोखोबाला पायरीशीच उभं राहायला लावलं नसतं. काशीची गंगा गाढवाला पाजली म्हणून एकनाथांची निर्भसना केली नसती. कारण ज्याला आपल्या आणि इतरांच्या मधले ते आत्मत्व एकच आहे हे समजतं, उमजते तो भेदाभेद करत नाही. मी त्या परमात्म्याचा अंश आहे हे लक्षात आलं की, मला नेमकेपणाने कुठे परत जाऊन मिसळायचे आहे, हे आत्मज्ञान जीवास सांगावे लागत नाही ते त्याचे त्यालाच कळते.
आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे, हे ज्याच्या त्याच्या ज्ञानावरच अवलंबून आहे. जो आपल्या ज्ञानाचा जसा वापर करतो तसा तो त्या मार्गाने जातो. जो आधात्माचे ज्ञान मिळवितो तो आधात्माच्या मार्गाने जाऊन शेवटी परमात्म्याच्या अंशाला जाऊन मिळतो, हे साधं तत्त्व मानवाला उमगले तरी मानव इतर मार्ग न पत्करता आधात्म्याचा मार्ग पत्करून ज्ञान मिळवून आत्मज्ञानी होईल. मात्र आधात्माचा मार्ग निवडला तर तो तुम्हाला वाटतो तितका सोपा नक्कीच नाही!