एकदा एका गावात मोठा दुुष्काळ पडला. पाण्यावाचून जीव तळमळत होते. पिकं वाळून जात होती. पाणी साठवायचं, पाणी जिरवायचं, अन् थेंबा थेंबानं तळं साठवायचं, असं एका म्हातारीनं मनावर घेतलं. तिनं मुलांना गोळा केलं. शेतात बांधावर, तालीवर छोटे छोटे खड्डे तयार केले. पाटाचा मोडका तोडका भाग दुरुस्त केला, बागेतल्या प्रत्येक झाडाखाली आळं केलं अन् म्हातारी मेघराजाची प्रार्थना करीत म्हणू लागली, “मेघराजा! ये अमृतधारा बरसत ये.
तुझ्या पावसाच्या सहस्र धारांनी सारी सृष्टी न्हाऊन निघू दे. कोरड्या पडलेल्या नद्या, नाले, विहिरी या भरून जाऊ देत. मेघराजा! आम्ही तुला वचन देतो. आम्ही तू देत असलेल्या पाण्याचा अपव्यय करणार नाही. त्या पाण्याची नासाडी करणार नाही. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे मोल ओळखून तो वाया जाऊ देणार नाही. हे बघ, आम्ही यासाठीच घाम गाळून ही पाणी साठवण्याची, जिरवण्याची त्याचा अधिकाधिक सदुपयोग करण्याची व्यवस्था केली आहे.
तेव्हा हे पर्जन्यदेवा! आता रागावू नकोस. आमच्यावर रुसू नकोस. केवळ हुलकावण्या देऊन दूर जाऊ नकोस. तुला आम्हा सर्व प्राणिमात्रांची दया येऊ दे. आमची तहान भागव. सृष्टी फुलवं. जीवन बहरू दे. कृपा कर मेघराजा’ या आर्त स्वरात त्या म्हातारीने मेघराजाची आळवणी केली. त्याला हात जोडून कळकळीची प्रार्थना केली. तिची ती प्रार्थना त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचली.
एके दिवशी सोसाट्याचा वारा सुटला, आकाशात काळे ढग दाटून आले. विजा चमकल्या अन् धो धो मेघ बरसू लागला. त्याच्या सहस्र धारांनी सारी सृष्टी न्हाऊन निघायला लागली.
त्या मुसळधार पडलेल्या पावसाने त्या म्हातारीनं आधीचं करून घेतलेली आळी भरली. खड्डे भरले. डबके तलाव भरले. पाटाला, विहिरीलाही पाणी आले. नदीला पूर आला. आठ दिवस पाणी बसरलं अन् एक नवं जीवनं फुललं. पाण्याला जीवन असं का म्हणतात, ते सर्वांना कळलं. थेंबा थेंबानं तळ साचलं. म्हातारीची ती कृती साठवलं की साठतं हे सर्वांना शिकवून गेली.
अरुण गोखले