असाच एक दिवाळीचा सण. वाड्यावरच्या श्रीराम मंदिरात सकाळी सकाळीच मोठ्या प्रमाणात भक्तगण छान वस्त्रालंकार घालून सोबत फराळाचे ताट घेऊन श्रीरामाच्या आणि महाराजांच्या दर्शनासाठी जमा झालेला. त्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून गोंदवलेकर महाराजांनाही मोठा आनंद झालेला.
ते आपल्या श्रीरामाला हीच विनंती करत होते की, बा रामराया! तुझ्या या सर्व भाविक भक्तांना हे असंच नित्य दिवाळीच्या सुखा, समाधानात ठेव. त्यांच्या जीवनात ही दिवाळी अशीच कायम राहू दे.
ते जे रामरायाकडे मागत होते, तीच सुखा समाधानाची नित्य दिवाळी कशी भोगायची, हे त्यांना त्यांच्या भक्तांना सांगायचे, शिकवायचे होते. म्हणूनच त्या लोकांकडे पाहून महाराजांनी विचारले, “बाबांनो! आज तुम्ही सारेजण असे आनंदी, सुखी, समाधानी कसे दिसत आहात? तुमच्या या आनंदा मागचं नेमकं कारण तरी काय?’
त्यावर एक व्यक्ती पुढे होत म्हणाली, “महाराज! अहो असं काय विचारता. अहो, आज दिवाळी नाही का? मग निदान या दिवशी तरी…’
तेव्हा महाराज समोरच्या भक्त मंडळींना समजावीत म्हणाले, “बाबांनो! जरा नीट विचार करा. दिवाळीचे दिवस आणि इतर दिवस हे काही वेगळे नसतात. प्रत्येक दिवस हा सारखाच असतो. त्या दिवशीचा वारही तोच असतो. त्या दिवशीचा होणारा सूर्योदय आणि सूर्यास्तसुद्धा त्याच वेळी होणारा असतो. मग हा दिवस एरवीचा आणि हा दिवस सणावाराचा, दिवाळीचा असा फरक का?
तर हा फरक त्या दिवसाचा नसतो, तर तो असतो आपल्या मानसिकतेचा. आज दिवाळी आहे म्हणून आपण काय करतो तर आनंदात राहतो. तो आनंद इतरांना वाटतो. निदान त्या दिवसासाठी तरी दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो. होय ना? मग बाबांनो!, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की, त्या प्रभू रामरायाच्या कृपेने ती मानसिक सुखा समाधानाची अवस्था ही तुम्ही नित्य जपा.
तो ज्ञानाचा दीप हा घरा-दारात आणि मनातही लावा. नित्याच्या दिवाळीचा अनुभव घेण्यासाठी मनाच्या दारात सद्विचारांची रांगोळी घाला. ज्ञानाचे दीप लावा. तुम्हीच तुमच्या जीवनातली नित्य दिवाळी अनुभवा. आनंद घ्या आणि तो इतरांनाही वाटा.