आपल्याला संसार, प्रपंच म्हणजे काय हे सांगायला लागत नाही. कारण, तो आपल्या चांगलाच परिचयाचा आहे, अनुभवाचा आहे. पण परमार्थ साधा, जोडा असा संताचा बोध सांगितला, की आपला प्रश्न हा असतो की परमार्थ म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचे उत्तर रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोधात फार सुंदररितीने दिले आहे. ते सांगतात की-
जन्मास आलेल्या जीवाने स्वत:ची नेमकी ओळख करून घेणे, प्राप्त झालेल्या नर जन्माची सार्थकता साधणे, मोक्ष अन् निज कल्याणाचा जो मार्ग तो कोणता हे जाणून घेणे म्हणजे परमार्थ. आपण आपला संसार, प्रपंच हा मोठ्या आवडीने करीत असतो. त्या आवडीमुळेच आपल्याला परमार्थ साधायला सवड मिळत नाही. कारण, जर तुम्हास परमार्थ साधायचा असेल तर तुमचं संसार, प्रपंच्यात रमणारं मन हे विवेकाने आवरावे लागते. त्याचा ईश्वरनामाची आवड लावावी लागते. ती आवड जर लावण्यात आणि लावून घेण्यात आपण यशस्वी झालो तर आपल्याला तो स्वानंद सुखाचा परमार्थ जोडता येतो.
इथ नेमकं काय आणि कुठे तोडायचे आणि ते कसे आणि कोणाशी जोडायचे हे कळायला हवे. प्रपंच्यातली विषयाची आसक्ती दूर करून ती ईश्वराच्या भक्ती सुखात परिवर्तित करण्याची कुशलता अंगी बाणवावी लागते. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही; पण अशक्यही नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक संतांनी दाखविलेला मार्ग आणि भक्तीची कास धरावी लागते. इतर साधनांचं फळ उशिरा पदरी पडतं पण परमार्थ साधनेनं ब्रह्म साक्षात्कार अन् वेदशास्त्रांनी सांगितलेलं आत्मज्ञानाचं रहस्य हे लवकर अनुभूतीला येते.
हे परब्रह्माचे ज्ञान गुरूज्ञानार्जनाशिवाय कोणालाही दिसत नाही. सारासार विचार केला, मायेचा पडदा दूर केला, मीच मला शोधत गेलो की तो कळतो आणि आपल्यालाच आपल्यापाशी अंतर्यामी ते परब्रह्म सापडते. अंतरीचा आत्माराम कळला की माया दूर होते. सर्वत्र तोच दिसू लागतो.
परमार्थ हा जन्माचे सार्थक करणारा, संसार भवसागरातून तारून नेणारा अन् जीवांचे खऱ्या अर्थाने कल्याण करणारा आहे. ज्याने परमार्थ जोडला तो त्रैलोक्याचा राजा होतो. ज्याने परमार्थ जोडला नाही, त्याच्याकडे सर्वकाही असूनही तो अपूर्णच असतो. या परमार्थाची इतर कशाशीही बरोबरी होत नाही.
अरुण गोखले