पुणे – कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलाव, पाषाण तलाव आणि जांभूळवाडी तलावाला जोडणाऱ्या नाले तसेच ओढयांमध्ये येणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट तलावात जाते. परिणामी, तलावांचे पाणी प्रदूषित होत असून तलावांमध्ये वर्षभर पर्यावरणास हानीकारक असलेल्या जलपर्णीचा विळखा पडलेला असतो. या जलपर्णीच्या विळख्यातून या तलावांची मुक्तता होणार आहे.
या तलवांमध्ये येणारे सांडपाणी 100 टक्के संकलीत करून या पाण्यावर तलावाच्या परिसरातच सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारून त्यावर प्रक्रीया करून हे पाणी तलावात सोडले जाणार आहे. या कामासाठी सुमारे 6 कोटींचा खर्च येणार असून केंद्राच्या 15व्या वित्त आयोगा अंतर्गत मिळालेल्या निधीतून प्रशासनाने याबाबतचे कामही सुरू केले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेस दरवर्षी जलपर्णी काढण्यासाठी अडीच ते तीन कोटींचा खर्च करावा लागतो. मात्र, सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामुळे ही समस्याच संपणार असल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले. या शिवाय, केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयांच्या तलाव सुशोभिकरण प्रकल्पात या तीनही तलावांचा समावेश असून हा प्रस्ताव मान्य झाल्यास हे तलाव सुशोभितही केले जाणार आहेत.
जलपर्णी काढण्याच्या खर्चात बचत
या तीनही तलावांमध्ये कोणतीही प्रक्रीया न करता थेट सांडपाणी येत असल्याने या तलावांमध्ये वर्षभर महापालिकेस जलपर्णी काढावी लागते. परिणामी या कामावर महापालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक वर्षी दोन ते अडीच कोटींचा खर्च करते. मात्र, या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रावर सहा कोटींचा खर्च केल्यानंतर महापालिकेचा या तलावात वाढणाऱ्या जलपर्णी काढण्याच्या कामाचा खर्चाची बचत होणार आहे.
60 लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया
या तीनही तलावांमध्ये दिवसाला प्रत्येकी 20 लाख लिटर सांडपाणी प्रक्रियेची क्षमता असलेले प्रकल्प उभारले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आधी या तलावांमध्ये येणाऱ्या सांडपाण्याचे नाले तसेच ड्रेणेज लाइनचे मॅपिंग करण्यात आले. त्यानुसार, या ड्रेनेज लाइन जोडून त्या थेट सांडपाणी केंद्रात आणल्या जातील. त्यानंतर, हे पाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडले जाणार आहे. यातील पाषाण तसेच जांभूळवाडी तलावांतील जागा निश्चित करण्यात आली असून कात्रज तलावातील जागा शोधण्याचे काम सुरू असल्याचे
डॉ. खेमनार यांनी सांगितले.
पारा 40 अंशांपार!
पुणे, दि. 5 -शहरात दोनच दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी 36.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी शिरूर तालुक्यात कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. तापमानात सतत होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, जिल्ह्यातील शेतमालावर आणि फळपिकांवर देखील परिणाम झाला आहे.