सणबूर – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल. कारखान्याच्या शेतकरी, सभासदांच्या खात्यावर एफआरपीची सर्व रक्कम अदा करण्यात आली आहे. ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी सभासद, शेतकरी यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस जाहीर करत असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी केली. दरम्यान, हा निर्णय देसाई कारखान्याच्या सभासद, शेतकरी आणि कामगारांसाठी खऱ्या अर्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे.
दौलतनगर, ता. पाटण येथे देसाई कारखान्याच्या 50 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वत्सला पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
यासमयी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे, अशोकराव पाटील, ङ.डी.पी. जाधव, ङमिलिंद पाटील, जालंदर पाटील, बबनराव भिसे, सुनील पानस्कर, सर्जेराव जाधव, विकास गोसावी, सुनील पवार, बी.आर. पाटील, गोरख देसाई, प्रकाशराव जाधव, बशीर खोंदू, शशिकांत निकम, अधिक पाटील, राजाराम मोहिते, कार्यकारी संचालक सुहास देसाई, कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन यशराज देसाई म्हणाले, गेल्या पन्नास वर्षांपासून देसाई कारखाना हा 1250 मेट्रिक टन क्षमतेत गाळप करत आहे. मात्र, यावर्षीपासून 1250 मेट्रिक टनाचा हा कारखाना तीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने त्याचा परिणाम उस क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 15 सहकारी व खाजगी साखर कारखाने असून त्या 1200 मे.टन क्षमतेचा लोकनेते बाळासाहेब देसाई हा एकमेव कारखाना आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या दरात देसाई कारखान्याने जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीत दर दिला आहे.
ही अभिमानाची बाब आहे. आगामी गळीत हंगामात हार्वेस्टरच्या मार्फत ऊस तोडणीसाठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी वेळेत होऊन ऊस गळीतास मदत होईल. 17 कोटींची मदत राज्य शासनाने कारखान्याला तातडीने केल्याबद्दल राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले.तसेच तालुक्यातील शेतकरी, सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस देसाई कारखान्यास देवून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही चेअरमन देसाई यांनी केले.