पुणे – शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून 15 रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यांवरील सुमारे 20 चौकांची फेररचना केली जाणार आहे. जी 20 अंतर्गत या रस्त्यांची महापालिका दुरुस्ती करून त्यासाठी यापूर्वीच निविदा काढलेल्या आहेत. या निविदांमधून हे काम केले जाणार आहे. तर यासाठीचा निधीही महापालिकेस आधीच प्राप्त झाला आहे. त्यामुळे, महापालिकेकडून टप्प्या टप्प्याने हे चौक दुरुस्त केले जाणार आहेत.
नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौक तसेच वारजे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
दरम्यान, महापालिकेकडून वाहतूक सुधारणांसाठी वाहतूक नियोजनाकारांचे पॅनेल तयार करण्यात येत असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.
कशासाठी होणार फेररचना ?
महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील मुख्य चौकात गेल्या काही वर्षात पदपथ, वाहतूक बेटे, आवश्यकतेनुसार, वेगवेगळे दुभाजक अशा प्रकारे सातत्याने बदल केलेले आहेत. मात्र, शहरातील वाढत्या खासगी वाहनांची संख्या, चौकांमध्ये झालेले अतिक्रमण तसेच चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांमुळे चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
तसेच चौकात मोठया प्रमाणात रूंदीकरणाची जागा ताब्यात असल्याने त्यावर पार्किंग तसेच इतर कारणामुळे वाहने थांबत असल्याने मोठे रस्ते ओलांडताना नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन चौकांची फेरचना केली जाणार आहे.
या असतील उपाययोजना
चौकांतील वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांना डाव्या बाजूला, सरळ जाण्यासाठी फ्री-वे उपलब्ध करून देणे, अनावश्यक पदपथ, वाहतूक बेटे काढणे, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा, चौकात अडथळा असलेले सिग्नल रस्त्याच्या बाजूला घेणे, चौकातील अनधिकृत बांधकामे काढणे, अनधिकृत पार्किंग बंद करणे अशा उपाय योजना केल्या जाणार आहेत.