फलटण : फरिदाबाद येथील फायनान्स कंपनी आणि फलटण तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांनी शेतकर्यांचे पेमेंट जमा न करता, फसवणूक केल्याची दखल घेऊन, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाने कारवाई करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर कृषी सेवा केंद्रांनी नोटिशीत नमूद असलेली जास्तीची रक्कम, त्यावरील दंड आणि व्याज संबंधित फायनान्स कंपनीकडे तात्काळ जमा केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
फरिदाबाद येथील केअर इंडिया फिनवेस्ट आणि फलटण तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांच्या वितरकांच्या माध्यमातून उधारी, निविष्ठा खरेदी-विक्रीचे लक्षांक पूर्ण न करणे, शेतकर्यांची संमती न घेता ऑनलाइन कर्जपुरवठा करणे, याबद्दल काही शेतकर्यांनी बाजार समितीच्या रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षाकडे तक्रार दाखल केली होती. समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील वितरक, पंचायत समितीचा गुण नियंत्रण विभाग, तालुका कृषी अधिकारी, बाजार समितीचे सचिव, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), शेतकरी, फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी यांची तातडीने बैठक घेतली.
शेतकरी आणि कृषी सेवा केंद्रांचे वितरक यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि मुंबईतील न्यायालयाकडून शेतकर्यांना आलेल्या नोटिसांची खातरजमा केल्यानंतर, शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे रघुनाथराजे यांनी निदर्शनास आणून दिले. फायनान्स कंपनी व कृषी सेवा केंद्रांनी शेतकर्यांचे पेमेंट तात्काळ जमा न केल्यास, शेतकरी समस्या निवारण कक्षाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर संबंधित कृषी सेवा केंद्रानी नोटिसांमध्ये नमूद असलेली जास्तीची रक्कम, दंड आणि व्याज सबंधित फायनान्स कंपनीकडे जमा केल्याचे रघुनाथराजे यांनी सांगितले.
शेतकर्यांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी फलटण बाजार समितीमध्ये शेतकरी समस्या निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडे वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल घेत शेतकर्यांना दिलासा देण्यात येतो, असे बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.