मुंबई : राज्यातील सत्तानाट्यानंतर राजकारणात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा निर्माण झाला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीने देखील या आरोप-प्रत्यारोपांमध्ये उडी घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सध्या एक दावा केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर २० लाख रुपये येतील. मात्र, इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात, दरम्यान, प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊत, अशी ऑफर देण्यात आल्याचेही मिटकरी म्हणाले.
दीड महिन्यापेक्षा जास्त शिंदे फडणवीस सरकार टिकणार नसल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. दीड महिन्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष असेल, अशा विश्वासही मिटकरींनी व्यक्त केला आहे.