चेन्नई – तामिळनाडुतील उत्तर चेन्नईच्या किनाऱ्यावर असलेल्या एका खत निर्मिती कारखान्यातील पाइपलाइनमधून अमोनिया वायूची गळती झाली, ज्यामुळे लोकांना श्वासोच्छवास, मळमळ आणि चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. त्यापैकी सुमारे २५ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
काल रात्री पावणे बाराच्या सुमाराला हा प्रकार घडला, त्यानंतर उत्तर चेन्नई भागातील हवेतून लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण करणारी दुर्गंधी पसरली. त्यांच्या घशात आणि छातीत जळजळ झाल्यामुळे अनेक लोक बेहोश झाले. झोपलेले बरेच लोक घाबरून जागे झाले आणि घराबाहेर पडले आणि त्यांनी शेजाऱ्यांना सावध केले. त्यामुळे घाबरलेले शेकडो लोक रस्त्यावर आले होते. काही जणांना खूपच त्रास झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तर चेन्नईतील चिन्ना कुप्पम, पेरिया कुप्पम, नेताजी नगर, बर्मा नगर हे क्षेत्र वायुगळतीमुळे बाधित झाले. कारखान्याची समुद्रात नेली गेलेली पाईप लाईन फुटल्याने ही वायू गळती झाल्याचे सांगण्यात येते. हा कारखाना कोरोमंडळ लि कंपनीचा होता.
आरोग्य मंत्री सुब्रमण्यन यांनी येथील शासकीय स्टॅनले मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला भेट दिली आणि गॅसबाधित भागातील लोकांशी चर्चा केली आणि हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे: वायु गळतीचा प्रकार आमच्या लक्षात आल्यांतर आम्ही आमची मानक कार्यप्रणाली ताबडतोब कार्यान्वित केली, आणि आम्ही अमोनिया प्रणालीची सुविधा वेगळी करून कमीत कमी वेळेत परिस्थिती सामान्य केली.