छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे विभागातील 76 पैकी 38 शहरांवर फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.
विभागीय प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जून 2024 पर्यंत एकूण 19 शहरांमध्ये पाणी टंचाई निर्माण होईल. तर एकूण 8 शहरांना जुलै 2024 अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध राहील. तसेच 6 शहरांना एप्रिल-मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल.
यासोबतच एकूण 12 शहरांना मार्च अखेरपर्यंतच पाणीपुरवठा होऊ शकेल. फेब्रुवारी 2024 पर्यंत 19 शहरांना पाणी देता येणार आहे. तर 4 शहरांना जानेवारीअखेरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. तसेच 2 शहरांचे पाणी स्त्रोत आटले आहेत.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील 8 हजार 496 गावात एकूण 47.42 एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे, मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 1 हजार 652 गावांचा अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत आहे. आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर 1356 गावातील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आतअसून,
जालना जिल्ह्यातील 971 गावं, परभणी 832 गावं, हिंगोली 707 गावं, नांदेड 1562 गावं, लातूर 952 गावं, बीड 1397 गावं आणि धाराशिव जिल्ह्यातील 719 गावातील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत आहे.
मराठवाड्यातील प्रकल्पातील पाणीसाठा..
प्रकल्प संख्या पाणीसाठा
मोठे प्रकल्प 5 70.97 टक्के
मध्यम प्रकल्प 11 41.61 टक्के
लघु प्रकल्प 165 45.81 टक्के
गोदावरी नदीवरील बंधारे 4 71.44 टक्के
एकूण प्रकल्प 185 65.06 टक्के