नवी दिल्ली : देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करून हेरगिरी करण्यात आल्याचे प्रकरण आता चांगलेच तापत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
काँग्रेसही या मुद्द्यावर आक्रमक झाली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी कशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. पेगॅसिस हे शस्त्रासारखे असून दहशतवाद्यांविरोधात वापरण्यासाठी इस्त्रायलने ते तयार केले होते.
या पेगॅसिस स्पायवेअरचा पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकराने आपल्याच जनतेविरोधात वापर केला आहे. या स्पायवेअरद्वारे हेरगिरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.