उस्मानाबाद – नाशिक जिल्ह्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शरद विठ्ठलराव देवरे, वय ४४, विलास महादू बच्छाव,वय४६, जगदीश चंद्रकांत दरेक, वय ४५, सतीश दादाजी सूर्यवंशी,वय ५० असे अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. संजय बाजीराव सावंत, वय ३८, भरत ग्यानदेव पगार,वय ३७, गोकुळ हिरामण शेवाळे, वय ३८, अशी जखमी भाविकांची नावे आहे. जखमी भाविकांना सोलापूरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मालेगाव तालुक्यातील काही भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावानजीक आल्यानंतर त्यांच्या वाहनाचे चाक फुटले असता रस्त्याच्या कडेला चाक बदलत असतानाच बीडकडून उस्मानाबादच्या दिशेने भरधाव आलेल्या (एमएच 20 इजी 1517) क्रमांकाच्या टेम्पोने पाठीमागून भाविकांच्या वाहनास जोराची धडक दिली.