मुंबई – “अमित शहा यांनी दिल्ली ते मुंबई येणे-जाणे करण्यापेक्षा मुंबईमध्येच एखादा दोन बीएचके फ्लॅट घेऊन टाकावा. एका रुममध्ये त्यांनी राहावे आणि दुसऱ्या रुममध्ये पंतप्रधान मोदी यांनी राहावे. सारखे -सारखे अप-डाऊन करू नये. मुंबईत महापालिकेची निवडणुक होईपर्यंत त्यांनी इथेच राहावे असा टोला, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. एका लग्नसमारंभासाठी ते मुंबईत आले असले तरी ते पक्षीय बैठक घेणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात आहे. खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी यापूर्वी ते मुंबईत आले होते. त्यानंतर एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मन की बातच्या शंभराव्या भागानिमित्त विलेपार्ले येथे होणाऱ्या कार्यक्रमातही हजेरी लावली.
दरम्यान नागपूर येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनास ते हजेरी लावणार होते मात्र काही कारणाने ते हजर राहू शकले नाहीत, अन्यथा त्यांचा हा या महिन्यातील तिसरा दौरा ठरला असता. यापूर्वी महाराष्ट्र भूषण समारंभाप्रसंगी ते उपस्थित होते मात्र या कार्यक्रमात उपस्थित श्रीसेवकांना उन्हात दिवसभस बसवल्याने 14 लोकांचा मृत्यू होऊन त्यावेळी कार्यक्रमाला गालबोट लागले होते.