Kashmir – पाकव्याप्त काश्मीरच्या ( Kashmir ) संदर्भात आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( amit shah ) यांनी काल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव ( lalu prasad yadav ) यांनी आज टीका केली आहे. शहा यांना कशाची माहिती नाही.
पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत त्यांना अमित शहाच जबाबदार आहेत असे म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सगळ्या जागा गमावणार असून आमचा विजय होणार आहे असे लालू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आमची पूर्ण तयारी झाली आहे असेही लालू यांनी सांगितले.
अमित शहा यांनी काल संसदेत केलेल्या भाषणात म्हटले होते की नेहरू यांनी केलेल्या दोन घोडचुकांचे परिणाम जम्मू काश्मीरला दिर्घकाळ भोगावे लागले. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तानसोबतच्या युध्दाच्या वेळी युध्दविराम करणे आणि जम्मू काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेणे या चुका नेहरू यांनी केल्या होत्या असे शहा यांनी म्हटले होते.
त्यावरून काल लोकसभेत गदारोळही झाला होता व विरोधकांनी सभात्याग केला होता. मात्र शहा यांना अनपेक्षितपणे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या एका खासदाराने पाठिंबा दर्शवला आहे. जनता दलाचे खासदार सुनील कुमार पींटू म्हणाले की आपल्या इतिहासात नेहरूंकडून चुका झालेल्या आहेत.
त्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीरवर दुसऱ्याचा कब्जा आहे. इतिहासात केलेल्या चुकीचे परिणाम आपण भोगत आहोत. पक्षाच्या भूमिकेचा प्रश्न नाही. तथापि, व्याप्त काश्मीरच्या प्रश्नाला नेहरूच थेट जबाबदार आहेत.
अधीर रंजन चौधरी यांचे प्रत्युत्तर
शहा यांच्या टीकेला कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीरचा मुद्दा आल्यावर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते विनाकारण पंडित नेहरू यांच्यावर टीका करतात असा आरोप चौधरी यांनी केला.
जर भाजपच्या नेत्यांना असे वाटते की नेहरू देशासाठी हानीकारण होते आणि भाजप देशासाठी कल्याणकारी आहे तर या विषयावर दिवसभर चर्चा केली जावी आणि काय खरे ते एकदा स्पष्टच होऊन जाऊ द्यावे.