नवी दिल्ली- भाजपचे सर्वात यशस्वी अध्यक्ष ठरल्यानंतर गृहमंत्री झालेले अमित शहा हे देशाच्या राजकीय मंचावर अधिक सक्षम नेते ठरले आहेत. विशेषतः पक्षामध्ये आणि हिंदुत्ववादी संघटनांचा महत्वाकांक्षी विषय असलेले राज्यघटनेतील 370 वे कलम रद्द करण्यात यशस्वी झाल्यावर शहा यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली आहे.
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवणे ही निःसंशयपणे “मोदी-2′ सरकारमधील अमित शहा यांची मंत्री म्हणून सर्वात ठळक कामगिरी ठरली आहे. दहशतवाद विरोधी कायदा अधिक कडक करण्याच्या विधेयकामुळेही त्यांची प्रतिमा संघवर्तुळात आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतही अधिक उजळली आहे.
भाजपचे वैचारिक मार्गदर्शक श्यामाप्रसाद मुखर्जी जम्मू काश्मीरच्या तुरुंगात असताना 1953 साली त्यांचा गूढ मृत्यू झाला. त्यांनी ज्यासाठी आंदोलन केले होते, ते करून दाखवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमित शहा यांना दिले जाते आहे. संसदेमधील भाषणांबद्दल भाजपच्या नेत्यांकडून अमित शहा यांचे कौतुक व्हायला लागले आहे.
त्यांची तुलना देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली जायला लागली आहे. “एनडीए’च्या बाहेरील वायएसआर कॉंग्रेससारख्या पक्षानेही अमित शहा यांचे कौतुक केले आहे. अमित शहा यांच्यामुळेच बीजेडी, वायएसआर कॉंग्रेस आणि बसपा सारख्या अन्य पक्षांचे सहकार्य मिळवून विरोधकांची एकजूट मोडण्यात भाजपला यश आले.
चतूर राजकीय धोरणी अमित शहा यांनी 370 कलम आणि जम्मू काश्मीरच्या फेररचनेच्या विधेयकावरून राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मतेचेवरील चर्चेचा आराखडाच तयार केला होता. त्यामुळेच भाजपचे कट्टर टीकाकार असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या “आप’नेही सरकारला पाठिंबा दिला.
भाजपचे अध्यक्ष असताना अमित शहा यांनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा या आपल्या पक्षाच्या अजेंड्याचाच पाठपुरावा केला होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचा व्यापक विस्तार झाला. मात्र राज्यसभेत अल्पमतात असल्याने मोदी सरकारला या मुद्दयांवर ठोस कृती करता आली नव्हती. अनेक राज्यांमध्ये आणि अलिकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अधिक मोठे बहुमत मिळवल्यावर या मुद्दयांवर ठोस कारवाईसाठी अमित शहा पुढे सरसावले. विरोधकांचे पाठबळ मिळवून राज्यसभेतही यशस्वी होण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली.
राज्यसभेमध्ये “एनडीए’ सरकार अजूनही अल्पमतात आहे. मात्र तरिही 125 विरुद्ध 61 मतांनी 370 रद्द करण्याचा ठराव आणि जम्मू काश्मीर फेररचनेचे विधेयक मंजूर झाले. वैचारिक ठाम, अमर्याद राजकीय कल्पकता आणि भाजपला यशस्वी करण्यासाठी वास्तविक राजकीय मुत्सदेगिरीच्या आधारे अमित शहा यांनी हे विस्मयकारी काम करून दाखवले आहे.