नवी दिल्ली – तालिबान्यांकडून अफगाणिस्तानातील अधिक जिल्हे ताब्यात घेतले जाऊ लागले आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्यामुळे तेथील भारतीयांना आता परत मायदेशी आणण्यात येणार आहे. 2001 मध्ये तालिबानचा पाडाव झाला तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांचे प्रमाण लक्षणीय होते.
अफगाणिस्तानच्या फेरउभारणीस “नाटो’बरोबर भारतानेही मोठे सहकार्य केले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत अफगाणिस्तानमधील फौजांची वाताहत होत असल्यामुळे तेथील भारतीयांना परत आणण्याच्या योजनांबाबत विचार सुरू आहे. यासाठी अफगाणिस्तानमधील भारतीय अधिकारी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे भारत सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
काबुलमध्ये भारताचा दूतावास आहे. त्याशिवाय कंदहार आणि मझारमध्ये वाणिज्य दूतावासदेखील आहेत. तेथे सुमारे 500 कर्मचारी तैनात आहेत. हारात आणि जलालाबादेती वाणिज्य दूतावास यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी माघारी आणले जाणार की, काही अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना तेथेच ठेवले जाणार हे अद्याप निश्चित नाही.