– अरुण गोखले
नानांच्या घरात सत्यनारायणाची पूजा चालू होती. लेक आणि सून हे परदेशातून सुट्टीसाठी आलेत म्हणून ती पूजा चाललेली होती. तिकडे गुरुजींचा मंत्र म्हणून झाला तरी सागरच्या हातातल्या जानव्याचा गुंता काही सुटत नव्हता. तो हा धागा तो धागा ओढत होता आणि नको त्या गाठी ओढल्या गेल्याने जानव्याचा गुंता हा न सुटता तो अधिकच वाढला होता.
त्याला जमेना म्हणून मग गुरुजींनीही प्रयत्न केला. पण त्यांनाही काही त्या कामी यश येईना. शेवटी नानाच उठले घरात गेले. आणि देवघरामधून नवा जानवी जोड घेऊन आले. तो गुरुजींच्या हाती देत नाना म्हणाले, ‘‘हा घ्या नवा जोड. तो गुंता राहू दे तसाच.’’ गुरूजींनी हवी तेव्हढी जानवी काढून घेतली. परत एकदा मंत्र म्हटला आणि देवास जानवे घालून पुढची पूजा सुरू झाली.
गुरुजींनी बाजूला ठेवलेला तो जानव्याचा गुंता हा नानांना मात्र परत परत खुणावत होता. त्या गुंत्याकडे पाहात असताना नानांच्या मनात विचार चालू होते की खरंच ह्या गुंत्यासारखेच तुमचे आमचे जीवन हेसुद्धा असेच गुंतागुंतीचे झालेले आहे. आपणसुद्धा आपल्या जीवनात नको त्या गोष्टीचा उगाच गुंता वाढवून घेतलेला असतो. जे साधं आहे सोपं आहे, सरळ आहे ते आम्ही उगाच आमची नको ती अक्कल लढवून अवघड करून टाकतो.
माणसाचे मन हे त्या कोळ्यासारखे असते. आपणच स्वत:भोवती नाना भल्या बुर्या कल्पनांचं विचारांचं जाळं विणत असतो. मी मी, माझं माझं हे त्या कोळ्याच्या जाळ्यासारखं असतं. जीव हा त्यातून सुटत नाही. उलट सुटण्याच्या प्रयत्नात तो अधिकच अडकत जातो. मानवी जीवनातले हे गुंते फार वेगवेगळे असतात. कधी ते भावनिक असतात कधी आर्थिक कधी सामाजिक, तर कधी प्रापंचिक.
पण ते गुंते हे त्याचे त्यालाच सोडवावे लागतात. इथे अन्य कोणा बाहेरच्या व्यक्तीची मदत होत नाही. त्यामुळेच खरं शहाणपण हे त्या गुंता सोडवण्यात नाही, तर ते तसे गुंते हे होणारच नाहीत, वाढणार नाहीत ह्याची खबरदारी घेण्यातच जीवाचे खरे कल्याण असते.