मीरत – राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी उत्तर प्रदेशातील राज्य, जिल्हा आणि विभागातील सर्व कार्यकारिण्या विसर्जित केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर चौधरी यांनी पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षाचे उत्त प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष मसूद अहमद यांनी शनिवारीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा देताना अहमद यांनी पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी आणि मित्र पक्ष समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावरही जोरदार टीका केली होती.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्यावतीने उमेदवारीची तिकीटे कोट्यवधी रुपययांना विकली गेल्याचा आरोप केला होता. पक्षाने उमेदवारी देताना प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले आणि श्रेष्ठीची संस्कृती राबवल्याचा आरोप अहमद यांनी एका खुल्या पत्राद्वारे केला होता.
जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांनी मिळून सर्वश्रेष्ठ असल्याची प्रतिमा निर्माण केली होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण झाला नाही. पक्षाने चुकीच्या उमेदवारांना तिकीटे दिल्यामुळे तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला. त्यांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागत असल्याचे अहमद यांनी आपल्या खुल्या पत्रामध्ये म्हटले आहे. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पक्षाने सर्व आरोप फेटाळले
निवडणुकीत उमेदवारांना तिकीटे विकली गेल्याचे प्रदेसाध्यक्ष मसूद अहमद यांनी केलेले आरोप राष्ट्रीय लोक दलाने फेटाळून लावले आहेत. आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच अहमद यांनी हे आरोप केले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय लोक दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस त्रिलोक त्यागी यांनी दिली आहे.
अहमद यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोक दलाच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारीची तिकीटे देण्यात आली होती. जर तिकीट वाटपाबाबत अहमद यांना काही आक्षेप होते तर जेंव्हा तिकीटे निश्चित केली गेली तेंव्हाच त्यांनी ही बाब पक्षाच्या वरिष्ठांशी बोलायला हवी होती, असे त्यागी म्हणाले.