मुंबई – ओबीसी घटकाचे विविध प्रश्न मार्गी लावायचे असतील तर ओबीसी म्हणून सर्वांनी एकत्र रहावे लागेल आणि संघर्ष करावा लागेल. ओबीसी समाजाला आरक्षण हे मोठ्या संघर्षातून मिळाले आहे. शरद पवार यांची मोठी साथ या संघर्षात होती. ओबीसींचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पुन्हा पूर्ववत करण्यासाठी समता परिषद आणि राज्य सरकार पुर्णपणे प्रयत्न करत आहे. शक्य असतील ते सर्व मार्गांचा आपण वापर करत आहोत. राजकीय आणि न्यायालयीन लढाई देखील चालू आहे. यापुढील काळात देखील संघर्ष करावा लागणार आहे यासाठी आपण तयार रहायला हवे. असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत शुक्रवारी(दि.22) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोकण विभागाच्या महत्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोकण विभागातील संघटनात्मक बांधणीवर आता सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. जनतेचे प्रश्न मांडायचे असतील तर संघटनात्मक बांधणी मजबूत असायला हवी. कोकणासारख्या पुण्यभूमीने पुरोगामी महाराष्ट्राला अनेक महापुरुष दिले आहे. त्यांचे विचार समाजातील तळागाळात पोहचविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करा.
शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी ही 6 मे रोजी आहे त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेऊन त्यांचे कार्य जनमानासापर्यंत पोहचवा. समता परिषद ही समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांची आहे त्यामुळे समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडण्याचे काम आपण केले पाहिजे, असेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत पार पडलेल्या या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजा राजपुरकर,राज्य सचिव रवि सोनवणे, सुभाष देवरे ,उमेश बोरगावकर, किरण झोडगे, अॅड भूमिका पाटील, अॅड स्वाती कांबळे,कुसुम गेडाम,संतोषी मोरे, राजेश मनोरे, विक्रम परमार हेमंत पाटील आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.