पाटणा – बिहारमध्ये दारूबंदी असतानाही दारूच्या तस्करीचा धंदा तेजीत आहे. अशातच राजधानी पाटणा येथील पोलिसांनी दारू तस्करांच्या एका गॅंगचा पर्दाफाश केला आहे. अतुल सिंह नावाचा 28 वर्षांचा युवक ही टोळी चालवत होता. त्याला अटक करण्यात आली असून त्याचे एमबीए पर्यंत शिक्षण झाले असल्याचे समजल्यावर पोलिसही चक्रावून गेले आहेत.
महात्मा गांधी नगर येथे वास्तव्य असलेल्या अतुल सिंह बाबत पोलिसांना टीप मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्याच्या घरातून 21 लाख रूपयांची 100 लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. अतुलच्या अटकेनंतर त्याने दिलेल्या कबुलीजबाबात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत.
स्वत: उच्चशिक्षण घेतलेल्या या युवकाने आपल्यासोबत बेरोजगार लोकांची एक टोळीच तयार केली होती. दारूबंदी असली तरी त्यांचा दारू विक्रीचा धंदा जोरात सुरू होता व दिवसाला 9 लाख रूपयांची दारू ते विकत होते. तस्करी करणाऱ्या या टोळीत 30 ते 40 सुशिक्षित युवकांचा भरणा होता व अतुल सिंह त्यांना दिवसाला 500 ते 1000 रूपये देत होता.