ब्रिस्बेन – बॉडर-गावसकर कसोटी मालिकेतील अखेरच्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही “ठाकूर’गिरी दाखविल्याने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांवर संपुष्टात आला. महंमद सिराजने 5, तर शार्दुल ठाकूरने 4 विकेट घेतल्या. चौथ्या दिवसअखेर पावसामुळे खेळ रद्द करण्यात आल्याने दुसऱ्या डावात भारताने नाबाद चार धावा केल्या आहेत. यामुळे हा सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे.
भारताला पाचव्या दिवशी ऐतिहासिक विजयासाठी 324 धावांची आवश्यकता असून 10 विकेट्स हातात आहेत. रोहित शर्मा, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. या फलंदाजांनी आवश्यक त्या वेगाने धावा केल्यास हा सामना भारताला जिंकता येऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलियालाही हा सामना जिंकण्याची संधी आहे. यामुळे हा सामना नक्की कोणाच्या बाजूने जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावांपासून पुढे खेळताना डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी सुरुवातीला चांगला खेळ केला. या दोघांनी डावाच्या 24व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला 80 धावांचा टप्पा पार करून दिला होता. मात्र, 25व्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला (38) बाद करत पहिला झटका दिला. त्यापाठोपाठ पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने वॉर्नरला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे वॉर्नरचे अर्धशतक थोडक्यात हुकले. वॉर्नर 75 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार मारले.
यानंतर मार्नस लेबुशेन आणि स्टिव्ह स्मिथ ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते असे वाटत असतानाच लेबुशेनला महंमद सिराजने बाद केले. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू वेडही शुन्यावर बाद झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघावरील दबाव वाढला. पण स्टिव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्मिथने शानदार कामगिरी करताना 52व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. पण पुढील षटकातच महंमद सिराजने स्मिथला बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन फलंदाजीसाठी आला.
दुसऱ्या सत्रादरम्यान आलेल्या पावसाच्या व्यत्ययाने काही वेळ खेळ थांबला होता. पण त्यानंतर पुन्हा तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला. तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर महंमद सिराजने 68व्या षटकात स्टार्कची विकेट घेतली. त्यामुळे स्टार्कला 1 धाव करून माघारी परतावे लागले. त्यानंतर पॅट कमिन्सला नॅथन लियॉनने चांगली साथ दिली होती. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी केली. पण शार्दुल ठाकूरने लियॉनला 13 धावांवर बाद करत ही भागीदारी डोकेदुखी ठरण्याआधीच तोडली. अखेर सिराजने जोश हेजलवूडची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांवर संपवला. पॅट कमिन्स 28 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 115.2 षटकात सर्वबाद 369; भारत पहिला डाव – 111.4 षटकात सर्वबाद 336; ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 75.5 षटकात सर्वबाद 294 (मार्कस हॅरिस 38, डेव्हिड वॉर्नर 48, स्टिव्ह स्मिथ 55, कॅमेरुन ग्रीन 37, पॅट कमिन्स नाबाद 28. महंमद सिराज 73-5, शार्दुल ठाकूर – 61-4, वॉशिंग्टन सुंदर 80-1) आणि भारत दुसरा डाव – 1.5 षटकात 4 (रोहित शर्मा नाबाद 4, शुभमन गिल नाबाद 0. मिचेल स्टार्क 4-0)