नागठाणे (प्रतिनिधी) – सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील नागठाणे ग्रामपंचायतीत अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्वासह सत्ता राखली आहे.या पॅनेलने सर्व 17 जागा जिंकून विरोधी चौंडेश्वरी ग्रामविकास पॅनेलचा धुव्वा उडवला. या ग्रामपंचायतीवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गटाचे वर्चस्व आहे.
गेल्या निवडणुकीत चौंडेश्वरी पॅनेलचे दहा तर अजिंक्य पॅनेलचे सात उमेदवार विजयी झाले होते; परंतु सरपंचपदाच्या निवडीवरून गदारोळ झाला होता. चौंडेश्वरी पॅनेलच्या सरपंचासह तीन सदस्यांनी अजिंक्य पॅनेलमध्ये उडी घेतल्याने अजिंक्य पॅनेल सत्तेत आले होते.
या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक दोन्ही पॅनेलसाठी प्रतिष्ठेची होती. त्यामध्ये अजिंक्य पॅनेलचे चंद्रकांत पवार, रेश्मा कदम, राजेश साळुंखे, रूपाली बेंद्रे, दीपाली साळुंखे, किरण साळुंखे, अनिल साळुंखे, वंदना सुतार, मनीषा जाधव, उषा कांबळे, बापूराव मोहिते, उषा साळुंखे, सुलोचना साळुंखे, हणमंत साळुंखे, प्रशांत तिवाटणे, स्वप्नाली नलवडे, दत्तात्रेय साळुंखे हे विजयी झाले आहेत.