लखनौ – कॉंग्रेसने भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना दिले. ते स्वीकारत अखिलेश यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. राहुल यांची यात्रा १६ फेब्रुवारीला उत्तरप्रदेशात प्रवेश करणार आहे. त्या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अखिलेश यांना दिले.
ते निमंत्रण अखिलेश यांनी स्वीकारल्याची माहिती सपने निवेदन जारी करून दिली. अमेठी किंवा रायबरेलीत अखिलेश यात्रेत सहभागी होतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. राहुल यांच्या यात्रेतील अखिलेश यांचा सहभाग इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ती इंडियासाठी पहिला धक्का ठरली. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडियाला दुसरा मोठा धक्का देत भाजपशी मैत्री केली.
त्या पार्श्वभूमीवर, उत्तरप्रदेशात राहुल आणि अखिलेश यांचे यात्रेवेळी एकत्र येणे इंडियाला सुखावणारे आहे. त्या राज्यात लोकसभेच्या सर्वांधिक ८० जागा आहेत. तेथील जागावाटपासंदर्भात कॉंग्रेस आणि सपमध्ये सुरू असलेली चर्चा सुरळितपणे होत असल्याचे सांगितले जात आहे.