Ajit Pawar : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जय्यत तयारी करत असल्याचे दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. दरम्यान, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे अजित पवारांमुळे खासदार झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या अजित पवारांमुळे निवडून आल्या, यावर बोलताना अजित पवार यांनी, “निवडून येणाऱ्याला माहितीय कोण कोणामुळे निवडून आलंय अन् निवडून आणणाऱ्यालाही माहितीय कोण कोणामुळे निवडून आलंय.’राज्य मागासवर्गीय आयोगावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. त्यात आम्ही कुठला ही हस्तक्षेप करत नाही. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तयारी झालेली आहे. महापालिका आणि इतर सगळ्या यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.”
तसेच राज्यात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांनी भाष्य करण्याचे टाळले. राज्यातील मागासवर्ग आयोगावर दबाव नसल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ‘त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत. राज्याच्या प्रमुख पदावर राहण्यासाठी लागणारं बहुमत त्यांच्या पाठिशी आहे.’
दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडलेली नव्हती त्यावेळी दादा पक्षात दादागिरी करायचे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ‘मी कामाचा माणूस आहे. सकाळी सहाला कामाला सुरूवात करतो. मी असले आलतू-फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही. किरकोळ किरकोळ प्रश्न ज्याला काही अर्थ नाही, दोन दिवस चघळायचं-चघळायंच त्याचा चोथा करायचा.”