पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केंद्रीय यंत्रणांद्वारे करण्याची मागणी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. हे वृत्त ताजे असतानाचा अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्देशानेच कारखान्याची विक्री झाली, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढलेत. ज्या गुरू कमोडिटीजने करार करून कंपनी चालवण्यास घेतली. त्या गुरू कमोडिटीजसोबत आपला काहीही संबंध नाही असंही अजित पवारांनी म्हंटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून कारखान्याची विक्री करण्यात आली. हा कारखाना विकत घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी 65 कोटींचं टेंडर भरला. आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
जरंडेश्वर प्रकरणात याआआधीही विविध तपास यंत्रणांनी चौकशी केली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. या जप्तीविरोधात कंपनीचे संचालक कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जातील, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.