पिंपरी, (प्रतिनिधी) – मी काही पाहत होतो की, एकनाथ खडसे यांच्या मनात पक्ष प्रवेशाबाबत चलबिचल सुरू होती. शेवटी ते निर्णय घेतात. शेवटी त्यांना योग्य निर्णय वाटेल तो घेऊन ते पुढे जातात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.
वाकड येथील खासगी रुग्णालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. ७) झाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार बोलत होते. पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे ते खरंच भाजपात प्रवेश करतील का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान आता एकनाथ खडसे यांनी स्वत: आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पुढील 15 दिवसांत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती दिली. यावर अजित पवार यांनी अप्रत्यक्षदुजोरा दिला आहे.
मावळ लोकसभेतील महायुतीच्या शिवसेना उमेदवाराकडून भाजप पदाधिकार्यांना विश्वासत घेतले जात नसल्याने ते प्रचारात सहभागी होणार नसल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, महायुतीमध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष असल्याने वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. शेवटी माणूस आहे. मात्र त्याला फार काही महत्व द्यावे असे मला वाटत नाही.
राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत मी दररोज चंद्रशेख बावनकुळे व देवेेंद्र फडणवीस यांच्या सेबत मी चर्चा करत असतो. भाजपमध्ये हे दोन महत्वाचे नेते आहेत. तसेच आशिष शेलार व अन्य नेतेदेखील यामध्ये लक्ष घालत आहेत. किरकोळ कुरबुरी असतात, मात्र महायुतीच्या उमेदवारांचे सर्व मित्र घटक पक्षांचे कार्यकर्ते काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीमध्ये जागा वाटपावरून मतभेद असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे. शेवटी प्रत्येक जण आपआपल्या पातळीवर त्यामधून मार्ग काढत असतो, असे सांगत आम्हाला तुमच्याकडूनच समजत आहे की या जागेचा तिढा आहे, त्या जागेचा तिढा आहे. मात्र मला तसे काही वाटत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आत तिढे सुटताना दिसतील, असे ते म्हणाले.
बारामती लोकसभा मतदार संघाबाबत ते म्हणाले की, बारामती लोकसभेचा उमेदवार जाहीर झाला नव्हता त्यामुळे नागरिकांच्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या. मात्र, उमेदवार जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी की राहुल गांधी यांच्या मागे जावे, असे पर्याय असलेल्या बहुतांशी नागरिकांच्या मनात मोदींच्या मागे जावे अशी बहुतांशी लोकांनी ठरविलेले दिसत आहे.