मुंबई : कुख्यात गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गजानन मारणेसह नऊ जणांना अटक केली. त्यानंतर त्याला जमीन देखील मंजूर करण्यात आला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
शिवजंयतीनिमित्त शिवनेरी गडावर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गजानान मारणेकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,“त्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे. त्याची माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल”.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीने अडचणी निर्माण करणारं कोणीही असो मग ती राजकीय क्षेत्रातील असेल, गुंडगिरी करणारी, किंवा टोप्या घालणारी असेल…कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांसाठी नियम लावले गेले पाहिजे. सर्वांनी चौकटीत राहूनच आपलं काम केलं पाहिजे”.
गजानन मारणे हा खुनाच्या प्रकरणात तळोजा कारागृहात होता. मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचं जंगी स्वागत केले.
सोमवारी तळोजा कारागृहातून गुंड गजानन मारणे याची सुटका झाली होती. त्याचं स्वागत करण्यासाठी ३०० पेक्षा अधिक वाहनं आणि तरुण एकवटले होते. तळोजा कारागृह ते पुणे यादरम्यान शक्तीप्रदर्शन करत मारणे याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. त्याचदरम्यान, द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे फूड मॉलजवळ मारणे याच्यासह सर्व कार्यकर्ते थांबले होते. त्यांनी आरडाओरडा करत बेकायदेशीर गर्दी जमवून फटाके वाजवले. तसंच, ड्रोनने चित्रीकरण करत दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.