सातारा -सहकार क्षेत्रातील सर्वच सूत गिरण्यांपुढे अनंत अडचणी आहेत. कापसाचे दर गगनाला भिडले असून त्या प्रमाणात सुताला योग्य भाव नाही. कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अशाही परिस्थितीत अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीने काटकसरीचे धोरण अवलंबून आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. अजिंक्यतारा सूत गिरणीचे कामकाज इतर गिरण्यांसाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
वळसे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची 33 वी वार्षिक सर्व साधारण सभा गिरणी कार्यस्थळावर उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उत्तमराव नावडकर होते. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की आठ हजार 400 चात्यावर सुरू झालेल्या गिरणीत आज 14 हजार 400 चात्या कार्यान्वीत आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारचे सूत निर्माण केले जाते. तसेच अजिंक्यतारा गिरणीच्या सूतास बाजारपेठेत चांगली मागणी आहे. गेले वर्षभर कापसाचे दर गगनाला भिडले असून त्याप्रमाणात सूतास योग्य भाव मिळत नाही. त्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. परिणामी कापसाचे दर कमी होतील अशी शक्यता वाटत नाही. तसेच युक्रेन युध्दामुळे सूत निर्यात पूर्णपणे बंद आहे. त्याचा परिणाम लोकल बाजारपेठेमध्ये सूताची आवक जादा झाल्याने सूताला दर मिळत नाहीत. अशा स्थितीत बहुतांश सूत गिरण्या बंद झाल्या आहेत. पण आपण 200 ते 250 कामगारांच्या हिताचा विचार करून काटकसरीने सूत गिरणी चालवली आहे.
शिवाय संस्थेचे कर्जाचे हप्ते व व्याजाची वेळेत परतफेड केली आहे. संस्थेचा प्रकल्प 25 हजार 200 चात्यांचा असून अजून 10 हजार 800 चात्या उभारणे बाकी आहे. उर्वरीत चात्या उभारणीसाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. सभेच्या प्रारंभी स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी यांनी श्रध्दांजली ठराव वाचन केले. चीफ अकौंटंट मानसिंग पवार यांनी अजेंड्यावरील विषय मंजूरीसाठी सादर केले. त्यास उपस्थित सभासदांनी मंजूरी दिली. जगन्नाथ किर्दत यांनी आभार मानले. सभेला व्हाईस चेअरमन बापूराव महाडिक यांच्यासह सर्व संचालक, अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंतराव साळुंखे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, माजी चेअरमन सर्जेराव सावंत, बाळकृष्ण फडतरे यांच्यासह विविध मान्यवर व सभासद उपस्थित होते.