– हिमांशू
“कोण आला रे कोण आला…’ ही घोषणा ऐकली की हल्ली घाबरायलाच होतं. कारण, कुठल्यातरी पक्षाचा, गटाचा, शहराचा, गल्लीचा “वाघ’ अत्यंत नम्रपणे येत असल्याची ती सूचना असते आणि या नम्रतेला चार पायांचे वाघही हल्ली घाबरतात. एकतर चार पायांचे वाघ सगळ्या वाघांना वाघच म्हणतात; पण दोन पायांच्या वाघांना फक्त स्वतःमध्येच वाघ दिसतो. दुसरं असं, की चार पायांच्या वाघांचे अधिवास आणि “टेरिटरी’ ठरलेली असते. दोन पायांचे वाघ आपला “अधिवास’ कधी बदलतील, सांगता येत नाही. त्यांच्या डरकाळ्यांना “टेरिटरी’चं बंधन नसतं आणि कुठले नियमही नसतात.
मुळात चार पायांच्या वाघिणीच्या बछड्यांचं बारसं चिठ्ठ्या टाकून का करायचं? जरी केलं तरी चिठ्ठी निघेल, ते नाव ठेवायचं ना! अर्थात “विक्रम’ नाव चांगलंच आहे; शिवाय चंद्रावर उतरल्यामुळे सध्या चर्चेतही आहे. पण “विक्रम’ पाठोपाठ इस्रोनं सूर्याच्या संशोधनासाठी जे यान सोडलं त्याचं नाव “आदित्य’च आहे ना? पण नावं ठेवायच्या बाबतीत माणसाचा हात वाघही धरू शकणार नाहीत. बिचारे पिंजऱ्यातच जन्माला आलेले वाघ… द्याल ते नाव धारण करणार. त्यांनी जंगल कधी पाहिलेलंच नाही. शिकारसुद्धा कधी केलेली नाही आणि भविष्यातही समोर येईल ते मुकाट्यानं खाणार आहेत. त्यांच्या नावालाच काय, दातांना आणि नखांनासुद्धा काही अर्थ नाही. दोन पायांचे वाघ मात्र नखं नसताना वाघनखांवरून एकमेकांना बोचकारणार!
सातासमुद्रापार म्युझियममध्ये असलेली लोखंडी वाघनखं खरोखर शिवछत्रपतींनी वापरलेलीच आहेत का? या प्रश्नावरून मानवी वाघ परस्परांना भिडले. राजकारण्यांपासून इतिहासकारांपर्यंत सगळ्यांनी मतप्रदर्शन केलं. तीन वर्षांसाठी ती वाघनखं भारतात आणण्यामागे इतिहासप्रेम आहे की राजकारण, यावर वाद रंगले. साडेतीनशे वर्षांपूर्वी वाघनखे नावाचं एक आयुध आपल्या महाराष्ट्रदेशी होतं आणि त्याचा कौशल्याने वापर केला जात होता, एवढी मर्यादित जिज्ञासा ठेवून त्याकडे पाहण्याचा मोठेपणा दोन पायांच्या वाघांमध्ये कसा असणार? बछड्यांची नावं ठेवण्यासाठी चिठ्ठ्या टाकणाऱ्यांकडून तो अपेक्षितही नाही. हे सगळं पाहून चार पायांच्या वाघांना काय वाटत असेल, असाही विचार कुणी करणार नाही.
या सगळ्या घडामोडी घडत असताना चार पायांच्या वाघांचं अस्तित्वच प्रश्नचिन्हांकित करणारी महत्त्वाची माहिती समोर आलीये. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत देशभरात 146 पट्टेरी वाघांचा मृत्यू झाला. आपल्या राज्यातच 32 वाघ दगावले असून, वाघांच्या मृत्यूबाबत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागलाय. देशात गेल्या अकरा वर्षांमधला वाघांच्या मृत्यूचा उच्चांक यावर्षी नोंदवला गेलाय. वाघांच्या अवयवांची तस्करी होण्याचं प्रमाण वाढलंय आणि आपल्याला त्याचं सोयरसुतक नाही.
“कोण आला रे कोण आला…’च्या गर्जना करताना वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे, हे तरी कुणाच्या लक्षात आहे का? वाघनखांच्या आगमनावरून एकमेकांवर खेकसणाऱ्या आणि बछड्यांच्या नामकरणावरून बालिश वाद निर्माण करणाऱ्यांपैकी एकाने तरी खऱ्या वाघांच्या या स्थितीबद्दल तोंड उघडलंय का? मानवी वस्तीत वाघ शिरला तर आपण “दहशत’ शब्द वापरतो; मग माणसानं वाघांच्या अधिवासात शिरून जे काही चालवलंय, त्याला काय म्हणणार? संकोचत चाललेली जंगलं दोन पायांच्या वाघांना कधी दिसतील की नाहीच?