नवी दिल्ली – देशात करोना महासाथ आल्यापासूनच अवघ्या देशवासीयांचे लक्ष प्रतिबंधात्मक लसीकडे लागून राहिलंय. अशातच आज केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देत मोठा दिलासा दिला. मात्र, ‘भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनने अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली नसतानाच परवानगी देणं धोकादायक ठरू शकतं’ अशी भीती काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आता AIIMS दिल्लीचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी बाजू मांडली आहे.
गुलेरिया यांनी, “करोना रुग्ण संख्येमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास अशा आपत्कालीन परिस्थितीत भारत बायोटेकची लस वापरण्यात येईल. सिरमच्या कोविशिल्ड लसीच्या परिणामकारकतेबाबत साशंकता निर्माण झाल्यास पर्याय म्हणून कोव्हॅक्सिनचा वापर करता येईल.” असं सांगितलं.
भारत बायोटेकच्या लसीला मिळालेल्या परवानगीबाबत बोलताना त्यांनी, “करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता लसींना परवानगी देण्यात आली असून ही परवानगी आपत्कालीन वापरासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. याबरोबरच भारत बायोटेकला लसीच्या चाचण्या सुरु ठेवायच्या असल्याने लसीच्या परिणामकारकतेबाबतची माहिती गोळा करण्याचं काम सुरूच राहील. लसीच्या परिणामकारकतेबाबत व सुरक्षिततेबाबतची माहिती मिळाल्यानंतर आपण लसीबाबत आश्वस्त होऊ.” असं स्पष्ट केलं.
“सुरुवातीला सिरमने तयार केलेली लस देण्यात येणार आहे. त्यांनी लसीचे ५ कोटी डोस तयार ठेवले असून आम्ही यातून ३ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करू. यातून अधिक माहितीसमोर येईल व तोपर्यंत भारत बायोटेकच्या लसीच्या पुढील टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्षही उपलब्ध झाले असतील.” असंही गुलेरिया यांनी सांगितलं.
Approval clearly says ’emergency situation’ keeping in mind the circulating variant strains & at the same time, they have to continue the trial & get the data in. Once that data comes in, we’ll be more confident as far as safety and efficacy is concerned: Dr. Randeep Guleria https://t.co/1CuAFW0Cqi
— ANI (@ANI) January 3, 2021