अकोले – श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर येथे 6 तारखेला एकादशी असल्याने अनेक दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करीत आहे. राजूरमध्ये 8ते 10 दिंड्या मुक्कामी असून, राजूर गावात जत्रेचे स्वरूप आले होते. राजूरमध्ये अनेक अन्नदाते दिंडीसाठी व्यवस्था करतात. यात प्रामुख्याने पन्हाळे बंधू , पाबळकर बंधू ,कवडे परिवार तसेच शांताराम काळे यांच्यासह अनेक दिंडीची व्यवस्था करतात.
मुळा परिसरातील राजा हरिश्चंद्रगड वारकरी दिंडी आज राजूरमध्ये दाखल झाली. या दिंडीला 6० वर्षाची परंपरा असल्याचे अध्यक्ष दत्तात्रय लांघी यांनी सांगितले. तसेच कुर्ट्वाडी येथील दिंडीची शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे. सुरुवातीला 150ते 200 भाविक असतात, नंतर ही संख्या 1500 च्या पुढे जाते. साधारण आठ मुक्काम या दिंडीच्या असून मजल दरमजल करत त्र्यंबकेश्वरला पोहोचते.
या दिंडीचे अध्यक्ष दत्तात्रय लांघी व दिनकर भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिंडीच्या नियोजनामध्ये सहभाग असतात. काल राजूरमध्ये दिंडीचे आगमन झाल्यानंतर माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांनी सकाळी दिंडीचे स्वागत करूनआशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. देवठाण येथेही वीरगाव, देवठाण व चिखली येथील दिंड्या एकत्र आल्या असता माजी आमदार वैभवराव पिचड यांनी त्यांचे स्वागत केले.