संगमनेर – आता निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी सुरू झाले आहे. मात्र फोनाफोनी करून पाणी फोडले जात आहे. अनेक गावांना वंचित ठेवले जात आहे. तुम्ही इकडे येतात ते तालुक्यातील विकासकामे थांबवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी. 35 वर्ष आपल्या घरातही खासदारकी होती. संगमनेरसाठी काय केले हा मोठा प्रश्न आहे, अशा शब्दात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टीका केली.
वडगावपान येथे पंचक्रोशीच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, दुर्गाताई तांबे, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, ऍड. साहेबराव थोरात, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक गावात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचा कलश करून त्याचे पूजन करण्यात आले.
आ. थोरात म्हणाले, निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत आहे. खरे तर त्यावेळी दुष्काळी गावांमधील सर्व बंधारे भरून घेता आले असते. मात्र, श्रेयासाठी पाणी सोडणे थांबवले. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी योगदान देणारे त्या ठिकाणी कोणीही नव्हते. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनाही बोलवले नाही.अकोले तालुक्याचे आमदारांनाही बोलवले नाही. एक प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही नव्हता. ज्यांनी योगदान दिले ते तिथे नव्हते. ज्यांचे काही योगदान नाही ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनतेला सर्व ज्ञात असल्याचा टोला लगावला.
नगर- मनमाड रस्ता का होत नाही, कोल्हारचा पूल तसाच लटकलेला आहे. खरे विकास कामे करण्याची तिकडे गरज आहे. ईडीच्या भीतीने तिकडे गेले कि ते मोकळे राहतात. यापुढे निळवंडेचे प्राणी प्रत्येक भागाला मिळेल व कोणीही वंचित राहणार नाही. डॉ. सुधीर तांबे, बाबा ओहोळ, दुर्गाताई तांबे, पद्माताई थोरात यांचीही भाषणे झाली. यावेळी मिरवणूक काढून आ. थोरात यांचा सत्कार करण्यात आला.