पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले आदेश, ग्रामस्थांसह पीडित कुटुंबीयांशी साधला संवाद
राहाता – ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणाने पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन होऊ शकत नाही. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. गावातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पिंपरी निर्मळ गावात मागील दोन दिवसांपासून घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता मंत्री विखे पाटील यांनी नागपूरहून येऊन गावातील ग्रामस्थ, अधिकारी आणि हल्ला झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. जिल्हाधिकारी सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्थ, तरुण, कार्यकर्ते, महिला यांच्याकडून झालेल्या घटनेची माहिती जाणून घेतली.गावातील काही कुटुंबीयांकडून होत असलेल्या त्रासाची माहिती सर्वांनी मंत्र्यापुढे सांगून जाणीवपूर्वक घटनेत सहभाग नसलेल्या व्यक्तिवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी केली.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पिंपरी निर्मळ गावात राजकीय वाद झाला परंतु असा जातीय संघर्ष कधी झाला झाला नाही. परंतु झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याचे समर्थन होऊ शकत नही. घटना घडली त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक या सर्व घटनेची निपक्षपणाने चौकशी करतील, असे जाहीर केले.
ग्रामस्थांनी सुध्दा या घटनेबाबत काही माहिती चौकशी अधिकाऱ्यांना द्यायची असेल तर द्यावी. गावात विनाकारण सामाजिक तेढ निर्माण होईल, असा प्रयत्न होऊ देवू नका. सामाजिक माध्यमातून काही मेसेज फिरत असतील तर गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वेळीच थांबवावेत. पोलीस प्रशासनाने सुध्दा वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गावातील दोन कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून केली. पीडित कुटुंबीयांचे म्हणणे त्यांनी जाणून घेतले. प्रारंभी जिल्हाधिकारी सालीमठ, पोलीस अधीक्षक ओला, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत मंत्री विखे पाटील यांनी चर्चा केली.