पुणे – राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) आदेशानुसार, महापालिकेकडून म्हात्रे पूल ते राजाराम पूल यादरम्यान डीपी रस्त्यालगतच्या मंगल कार्यालयासह इतर सुमारे ३० व्यावसायिकांना महापालिकेने नोटीस बजावली होती, यात नदीपात्रातील ब्लू लाइन मधील बांधकामे न काढल्यास महापालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. शुक्रवारपासूनया बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, महापालिकेची कारवाई सुरू असतानाच या ठिकाणी जवळपास आठ लग्न सोहळे होते. मात्र, या सोहळयाला अडचण न करता महापालिकेने ही कारवाई केली. त्यामुळे कोणत्याही गोंधळाविना तब्बल दीड लाख चौरस मीटर क्षेत्र रिकामे करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
ब्लू लाइनमध्ये करण्यात आलेल्या या बांधकामांविरोधात या भागातील सोसायटीने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली होती. यामध्ये झालेल्या सुनावणीनुसार १० डिसेंबरपर्यंत विनापरवाना शेड, बांधकामावर कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने १ डिसेंबर रोजी येथील जागा मालकांना व व्यावसायिकांना नोटीस बजावून त्यांचे शेड व इतर बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरी अनेकांनी शेड काढले नव्हते.
त्यातच, महापालिकेच्या नोटीसपूर्वीच या कार्यालयांनी लग्नांसाठी बुकिंग दिल्याने ऐन वेळी कारवाईची पथके पोहचल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, अधिकार्यांनी नागरिकांना कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येणार नाही, याची शाश्वती दिल्याने कोणताही वादाचा प्रसंग उद्भवला नाही. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आणि कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. तसेच, ज्यांनी स्वत: बांधकामे काढली नाहीत त्यांच्यावर शनिवारी कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.