अकोले – जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे जलपूजन व लोकार्पण गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण साईट येथे कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेचे कळ दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.
सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. निळवंडे धरणाच्या भिंतीवर जलपूजन तसेच निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यात पंतप्रधानाचे हस्ते बटन दाबून पाणी सोडण्यात आले. तसेच या ठिकाणी असलेल्या जलसंपदाच्या विश्रामगृहाजवळ मोदीच्या हस्ते एक झाड लावून वृक्षारोपन करण्यात आले. पंतप्रधानानी हेलिकॉप्टरमधून निळवंडे धरण व परिसराची हवाई पाहणी केली. मोदीचे हेलिपॅडवर तालुक्याचे आ. किरण लहामटे, माजी आ. वैभवराव पिचड, यशवंतराव आभाळे आदिनी स्वागत केले. निळवंडे धरण परिसरात दिल्ली व महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कार्यक्रमस्थळी कुणालाही प्रवेश मिळाला नाही. अनेक लोक मोदी यांना पाहण्यासाठी डोंगरावर चढले होते.
नागरिकांचा हिरमोड
अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान येत असल्याने तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला येणार होते, मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे नागरिकांना फार लांब राहुन फक्त हेलिकॉप्टर आकाशातुन जाताना पाहता आलेने नागरिकांचा हिरमोड झाला.
याचा अकोले तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध
मधुकर पिचड यांनी अर्धे आयष्य निळवंडे धरण व पुनर्वसन यासाठी खर्ची घातले. त्यांच्यामुळे आजचा दिवस आहे. ज्येष्ठ होते. भाजपत आहेत. तरी त्यांना कार्यक्रमला न बोलवणे. या त्यांचा व त्याग करणाऱ्या अकोले तालुक्यातील जनेतचा व धरणग्रस्तांच्या अपमान आहे. अजुन अकोले तालुक्याला पाणी सुद्दा दिले नाही.
बाळासाहेब भोर, अध्यक्ष अगस्ती पतसंस्था, अकोले