कोपरगाव – तालुक्यासह गोदावरी व भंडारदरा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी बारमाही पाणी देण्याच्या बोलीवर सीलिंग ऍक्टच्या नावाखाली काढून घेण्यात आल्या. परंतु आता सरकार बारमाही पाणीही देत नसल्याने आमच्या घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, अशी मागणी संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी एका कार्यक्रमावेळी केली.
या वेळी बिपीन कोल्हे म्हणाले की, सरकारने सीलिंग ऍक्टच्या नावाखाली राज्यातील गोदावरी, भंडारदरा व निरा खोऱ्यातील कालव्यावरील सिंचनाखाली असलेल्या शेकडो एकर जमिनी शेतकऱ्यांकडून केवळ बारमाही पाणी देण्याच्या नावाखाली काढून घेतल्या. कोपरगाव तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या कायद्याच्या नावाखाली गेल्या.
कालांतराने नियमित शेतीसाठी कालव्याद्वारे मिळणारे पाणी समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली कमी करत गेले. आज शेती सिंचनाला पाणी मिळणे तर दूरच; पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची खंत कोल्हे यांनी व्यक्त केली. स्व. शंकरराव कोल्हेंनी संपूर्ण आयुष्य पाण्यासाठी घालवले, म्हणूनच आपल्याला सध्या पाण्याची झळ इतकी पोहचली नाही. जर कोल्हेंनी धरणाचे वाढीव काम करून घेतले नसते, तर यापेक्षा भयानक स्थिती झाली असती, असेही कोल्हे शेवटी म्हणाले.
शांतीची नाही तर क्रांतीची गरज!
राज्यातील 40 टक्के भाग गोदावरी खोऱ्यात येतो. केवळ पाण्याचे नियोजन व्यवस्थित नसल्याने या लाभक्षेत्रातील शेतकरी वंचित ठेवले आहेत. गेल्या 30 वर्षांपासून मी पाण्यासाठी लढा देत आहे. या लाभक्षेत्रातील भावी पिढीसाठी आता नवीन पिढीने पुढे आले पाहिजे. भावी पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आता शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, असे बिपीन कोल्हे यांनी सांगितले.