पाथर्डी – मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करीत आहेत. यासाठी राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असतांना त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकारमधील काही मंत्री बेताल वक्तव्य करून मराठा समाजाचा अपमान करीत आहेत. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजावर बेताल वक्तव्य करून कुणबी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. राणेसह इतर नेते देखील मराठा कुणबी समाजावर तोंड सुख घेत आहेत. समाजाबद्दल अनुचित विधान करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, या मागणीसाठी मोहोज देवढे येथील ग्रामस्थांनी शहरातील नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
2023 पर्यंत अनेक आयोग आले, अनेक समित्या स्थापन झाल्या परंतु मराठा आरक्षणाची सक्षम बाजू न्यायालयात मांडण्यात कुणालाही यश आले नाही. केंद्रीयमंत्री नारायण राणे सध्या कुणबी नोंदीच्या आधारे महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी समर्थन देण्याऐवजी 96 कुळी मराठा वेगळा आणि कुणबी समाज वेगळा असे वक्तव्य करून आरक्षणास खिळ घालण्याचं काम करत आहेत. त्यांच्याबरोबर रामदास कदम, अँड गुणरत्न सदावर्ते हे देखील मराठा आरक्षणाबाबत नकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत. ज्यांना आम्ही निवडून दिले.
ते सर्व आमदार आणि खासदार हे काय करत आहेत अशा शब्दात आदिनाथ देवढे यांनी सरकारचा निषेध केला. नाईक पुतळ्यापासून निघून मराठा आंदोलकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर आला. त्या ठिकाणी आमरण उपोषण करत असलेले ऍड. सुनील राजळे आणि सोमनाथ म्हस्के यांची आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी मोर्चामध्ये सोमनाथ बोरूडे, बबलू वावरे, संदीप देवढे, कल्याण देवढे, गोरख देवढे, ओम काटे,भाऊसाहेब देवढे, रामभाऊ देवढे, गोरक्ष काटे, संकेत देवढे, ओम काटे आदी सहभागी झाले होते.