कोपरगाव – तालुक्यातील शिंगणापूर येथील माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांची कन्या कविता महेंद्र कुऱ्हे या माहेरी आल्या होत्या. त्या कोपरगाव बसस्थानक येथे कोपरगाव- नाशिक या गाडीने चढत असताना त्यांच्या हातातील बॅगमधील पर्समधून ३२ हजार रुपयांची रोकड चोरटयांनी लंपास केली. याबाबत अजूनही तपास लागत नाही.
कोपरगाव बसस्थानकाचे आधुनिकीकरण झाले, त्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र ते उजव्या बाजूस आहेत तर बसचा दरवाजा डाव्या बाजूस असल्याने कोपरगाव- नाशिक गाडीतून प्रवास करताना कविता कुऱ्हे या बसमध्ये चढण्यासाठी दरवाजाजवळ गर्दी असल्याने उभ्या राहिल्या. गर्दीचा फायदा चोरटयांनी घेत त्यांच्या दोन्ही हातात बॅगा असल्याने बॅगेतील पर्सची चैन उघडून त्यातील रोख रक्कम ३२ हजार रुपयांवर डल्ला मारला. त्याचवेळेस खडकी येथील संगिता चव्हाणके या महिलेची ५ हजार रुपये चोरटयांनी चोरले.
दुसऱ्या एका महिलेच्या गळयातील सोन्याची पोत चोरली. एवढ्या घटना घडूनही पोलिसांकडून अद्यापही याचा तपास नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांना कोपरगाव पोलीस स्थानकामध्ये दिवसभर बसवून ठेवण्यात आले, त्यानंतर त्यांची तक्रार नोंदविण्यांत आली.
कोपरगाव बस स्थानकावर चोऱ्यांचा घटनांत वा झाली आहे. पाकीटमारी, सोनसाखळी हिसकवणारे, छेडछाड करणारे, मोबाईल चोरणारे अशा सराईत गुन्हेगारांची छायाचित्रे कोपरगाव बसस्थानकावर लावावी. त्याचप्रमाणे कोपरगाव आगर प्रमुखांनी याबाबत काळजी घेऊन बस प्रवाशांचा प्रवास कसा सुरक्षित होईल हे पहावे, अशी मागणी माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांनी केली आहे.