कर्जत – खरिपाचा शेतमाल विकून रब्बी हंगामासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांची आता कृषी व्यावसायिकांनी राज्यव्यापी संप पुकारल्याने कोंडी झाली आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कायदा क्रमांक 40, 41, 42, 43. व 44 यातील जाचक अटींच्या निषेधार्थं तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांकडून संप पुकारण्यात आला आहे.
कर्जत तालुका सिड्स पेस्टीफर्टी डीलर्स असोसिएशनने याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले. राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कायद्यात ज्या जाचक अटी व नियम लागू करायचे ठरविले आहे, त्याच्या विरोधात माफदाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व कृषी केंद्र तीन दिवस बंद राहणार असल्याबाबत म्हटले होते. आज बंदचा शेवटचा व तिसरा दिवस असून शहरासह तालुक्यातील सर्व खते, बी-बियाणे विक्रेते यांनी दुकान बंद ठेवून उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद दिला.