संगमनेर – शहरातील घोडेकर मळा, साईबाबा मंदिर ,पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नातून या पुलाचे काम सुरू होत आहे. मात्र, ज्यांनी श्रेयासाठी पुलाचा निधी अडवण्याचा प्रयत्न केला ती भाजपाची मंडळी आता खोट्या बातम्या देऊन श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत असल्याची टीका शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली.
2022 मध्ये आलेल्या पुरामुळे म्हळुंगी नदीवरील पूल खाचला होता. त्यामुळे घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा शाळा व महाविद्यालय, गंगामाई घाट परिसरातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी गैरसोय झाली होती. यामुळे या पुलाचे काम तत्काळ व्हावे, याकरिता आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 30 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र देऊन या कामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या कामाला साडेचार कोटींचा निधी दिला.
मात्र, हा निधी मिळू नये, याकामी स्थानिक भाजपाने सत्ताधाऱ्यांनी मार्फत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे. आता पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने हीच मंडळी श्रेयासाठी सरसावली आहे. त्यांनी एक तरी चांगले काम केले का ? याचे उदाहरण जनतेला दाखवले पाहिजे. फक्त पत्रकबाजी करण्यात पुढे असलेल्या या पुढार्यांचे किंवा त्यांच्या पक्षाचे विकास कामांमध्ये योगदान काय, असा सवाल करताना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच हे काम होणार असल्याचे सर्व नागरिकांना माहिती आहे.